सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘ज्ञानशिल्प’ लोकार्पण सोहळा संपन्न; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची गाथा आता विद्यार्थ्यांसमोर
पुणे, दि. २१ : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करणाऱ्या ‘ज्ञानशिल्प’ सृष्टीचे लोकार्पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते दिमाखात करण्यात आले. सावित्रीबाईंच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंग शिल्परूपातून साकारण्यात आले असून, विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्यांच्या विचारांची प्रेरणा देणारे हे स्थळ विद्यापीठाच्या ज्ञानपरंपरेत महत्त्वाची भर ठरणार आहे.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य श्री. राजेशजी पांडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य नितीन घोरपडे, प्राचार्य देविदास वायदंडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार, श्री. प्रसेनजित फडणवीस, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, वित्त व लेखाधिकारी सीएमए डॉ. चारुशीला गायके, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विद्या परिषद सदस्य, विद्यापीठ अधिकार मंडळाचे पदाधिकारी, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिल्पांची निर्मिती करणारे नामवंत शिल्पकार नवीन शेखमवार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
‘मी सावित्रीची लेक’ – उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार
यावेळी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार म्हणाल्या, “मी स्वतः सत्यशोधक चळवळीत काम केले असून, मी सावित्रीची लेक आहे. विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचा सुवर्णकाळ मी अनुभवला आहे. विविध पक्षांचे लोक एकत्र येऊन विद्यापीठाच्या हितासाठी उत्तम काम करू शकतात, याचा अनुभव मला आहे. सावित्रीबाईंच्या विचारांची ज्योत घराघरांत पोहोचल्यामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहेत.”
भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी तसेच नायगावच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी महिलांना अधिकृत ओळख देणारा राज्य सरकारचा निर्णय क्रांतिकारी असल्याचे नमूद करत फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’ मिळावा, ही सर्वांचीच इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतिहासाला वर्तमानाची जोड आवश्यक – कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, “सावित्रीबाई फुले यांचे विचार हे समता, शिक्षण आणि सामाजिक कल्याणाचे होते. आज एआयचे युग कितीही पुढे गेले तरी माणुसकी आणि नैतिक जीवनाचा पाया सर्वांत महत्त्वाचा आहे. या ज्ञानशिल्पांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या जीवनातील २८ महत्त्वपूर्ण प्रसंग मांडण्यात आले आहेत. हे विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे गरजेचे असून, नागरिकांनीही मोठ्या संख्येने या ज्ञानशिल्पांचा लाभ घ्यावा.”
‘ज्ञानशिल्पे युवा पिढीसाठी प्रेरणास्थळ ठरतील’ – राजेशजी पांडे
विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे म्हणाले, “ज्ञानशिल्पाची कल्पना मांडल्यापासून आजच्या लोकार्पणापर्यंतचे पर्व अत्यंत गतिमान राहिले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला रोषणाई करण्याची आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवन चित्ररूपातून मांडण्याची कल्पना सुनेत्राताई पवार यांची होती. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या २४ परवानग्या अजितदादांनी अवघ्या ३० मिनिटांत मिळवून दिल्या. ही ज्ञानशिल्पे युवा पिढीसह विद्यापीठात येणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणास्थळ ठरतील.”
सावित्रीबाईंच्या जीवनकार्याची शिल्परूपातून मांडणी
शिल्पकार नवीन शेखमवार यांनी साकारलेल्या या ज्ञानशिल्पांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंग, त्यांचे शैक्षणिक कार्य, स्त्रीशिक्षणासाठी केलेला संघर्ष, सामाजिक समता, मानवतावादी मूल्ये आणि समाजपरिवर्तनाची ध्येयवादी वाटचाल प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. त्यामुळे इतिहासातील प्रेरणादायी घटना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिल्परूपातून अनुभवता येणार आहेत.
ही ज्ञानशिल्पे आजपासून विद्यार्थी आणि नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. सावित्रीबाईंच्या विचारांची प्रेरणा, शिक्षणाचा संदेश आणि सामाजिक समतेची मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे हे ज्ञानशिल्प विद्यापीठाच्या परिसरातील एक महत्त्वपूर्ण प्रेरणास्थळ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले.






